Tuesday, September 13, 2011

मराठी रियासत - खंड १ ते ८



मराठी रियासत - खंड १ ते ८
लेखक : गोविंद सखाराम सरदेसाई
पहिली आवृत्ती 1929
पुनर्मुद्रण 2010
प्रकाशक रामदास भटकळ, पॉप्‍युलर प्रकाशन प्रा. लि.
खंड 1 ते 8 - संपूर्ण संचाची किंमत रु. 5,500/-

     या आठ खंडांमध्‍ये शिवपूर्वकालापासून ते पेशवा दुसरा बाजीराव येथपर्यंत प्रदीर्घ कालखंड तारीखवार शब्‍दांकित केला आहे. लौकिक अर्थाने शिक्षण पूर्ण झााल्‍यावर गोविंद सखाराम सरदेसाई बडोदे संस्‍थानाच्‍या, 'सयाजीरावांकडे' रीडर पदावर काम करण्‍यासाठी रूजू झाले.  आपल्‍या सचोटीने, मेहनतीने व हुषारीने महाराजांचा विश्वास संपादला. या काळात बडोदे राजघराण्‍यामधील मुलांच्‍या शिक्षणाची जबाबदारी त्‍यांच्‍यावर पडली. त्‍यांना इतिहासाचे शिक्षण देण्‍यासाठी रियासतकारांनी इतिहासाशी संबंधित दप्‍तरे शोधायला सुरूवात केली. सयाजीरावांचे निकटवर्तीय असल्‍यामुळे त्‍यांना सातारा दप्‍तर, पुणे येथील पेशवा दप्‍तर तसेच अनेक इतर महत्त्वाच्‍या ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्‍यास करण्‍याची संधी मिळाली. या संधीचे त्‍यांनी सोने केले. अनेक वर्षांच्‍या सतत केलेल्‍या संशोधनातून मराठी रियासतचे ८ खंड तयार झाले.
     या खंडांमध्‍ये रियासतकारांनी लिहिलेल्‍या प्रस्‍तावना छापलेल्‍या आहेत. त्‍या वाचणे म्‍हणजे इतिहासाची आवड असणा-यांसाठी पर्वणी ठरते. रियासतकार म्‍हणतात की, या प्रस्‍तावनांचे सार अतिशय थोडक्‍यात सांगायचे झाले तर असे म्‍हणता येईल की, 'सतत नवनवीन संशोधन होत असते. नवीन नवीन कागदपत्रे प्रकाशात येतात त्‍यामुळे इतिहासामधील व्‍यक्तिरेखांवर नव्‍याने प्रकाश पडतो किंबहुना असेच झाले पाहिजे. आज ज्‍या ऐतिहासिक घटनांचा अर्थ लागत नाही त्‍यांचा अर्थ काही ऐतिहासिक दस्‍तऐवज प्रकाशात आल्‍यानंतर नव्‍याने लागू शकतो.'
     मराठेशाहीच्‍या -हासाची कारणे या ८ व्‍या खंडामध्‍ये आपणास सापडतील. रियासतकार म्‍हणतात की -
"मराठेशाहीचा -हास होण्‍याचे प्रमूख कारण म्‍हणजे बेफाम, साहसी, शौर्यवान व्‍यक्‍तींना योग्‍य दिशा देऊन त्‍यांच्‍या पराक्रमाचा योग्‍य तो उपयोग करुन घेणारा धनी नव्‍हता." 

     रियासतकारांच्‍या इतिहासलेखनाचे वैशिष्‍ट्य असे की ते ऐहिहासिक दस्‍तऐवज जसे प्राप्‍त झाले तसे वाचकांसमोर मांडतात. मग वाचकांनी त्‍यामधून त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या वकूबाप्रमाणे निश्कर्ष काढावा. रुढार्थाने इतिहासकार जसे इतिहासाच्‍या थोडृयाशा कालखंडावर आपले लक्ष केंद्रित करुन त्‍यामध्‍ये खोलवर जातो (जसे शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदर) त्‍याप्रमाणे रियासतकारांनी केले नाही. त्‍यांनी साधारणतः हजार-बाराशे वर्षांचा ऐतिहासिक कालखंड सूचिबद्ध केला. त्‍यामुळे एवढ्या सर्व कालखंडाचा सखोल अभ्‍यास करण्‍यास त्‍यांना वेळच मिळाला नाही. मात्र इतिहासाच्‍या अभ्‍यासकांकरिता एक अमुल्‍य ठेवा त्‍यांनी निर्माण केला आहे यांत संशय नाही. 

     जसे आपल्‍याला आलेले पत्र वाचून समोरच्‍या माणसाची भेट घेतल्‍याचे थोडेसे समाधान मिळते त्‍याचप्रमाणे सुप्रसिद्ध ऐतिहासिक व्‍यक्तिमत्‍वांची भेट त्‍यांच्‍या पत्रांमधून घेता येते. महादजी शिंदे आणि नाना फडणीस, अहिल्‍याबाई होळकर आणि तुकोजी होळकर, त्‍यावेळचा दिल्‍लीचा बादशहा यांची व्‍यक्तिमत्‍वे आपल्‍याला अशीच भेटतात व आपण ऐतिहासिक काळातील स्‍वतंत्र हिन्‍दुस्‍थान अनुभवायला लागतो. ही भेट मोठी आनंददायक असते खास . . . . यात संशय नाही.
     आपल्‍या जवळच्‍या ग्रंथालयामधून आणून हे रियासतीचे खंड वाचायला मी सुरूवात केली. त्‍याला आज ४ वर्षे पूर्ण झाली. या चार वर्षात ही रियासतीची पुस्‍तके/खंड माझ्या घरी बराच काळ वास्‍तव्‍याला आलेल्‍या पाहुण्‍यांप्रमाणे तळ ठोकून असायची. शेवटी ग्रंथालयामधून फोन यायचा की आता अमूक अमूक खंड परत करा त्‍यासाठी इतर कोणी वाट पाहते आहे. मग घाईघाईने तो खंड वाचून, त्‍याची टिपणे काढून तो खंड मी परत करीत असे. असा हा ४ वर्षांचा आनंददायक प्रवास. दिवभराची कामे संपल्‍यावर या रिसासतीमध्‍ये डोके खुपसून बसले की जणू मला त्‍यावेळचा काळ आणि परिस्थिती समोर दिसू लागे. आपण सिनेमा पाहतो ना. एकेका ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वाची गुंतागुंत काय सांगावी. . .
     युद्धामध्‍ये तसेच मुत्‍सद्देगिरीत नाव कमाविलेला महादजी शिंदे. विजेप्रमाणे तळपणारा थोरला बाजीराव. सवाई माधवरावाला वाचविण्‍यासाठी जंग जंग पछाडणारा नाना फडणीस अति शिस्‍तीपाई सवाई माधवरावाच्‍या आत्‍मघाताचे कारण बनतो.
     जन्‍मापासून तुरुंगात राहिलेला व आपल्‍या कारकर्दीतमध्‍ये संपूर्ण राष्‍ट्राला सुखासुखी ब्रिटिशांच्‍या गुलामीत लोटणारा दुसरा बाजीराव हे व्‍यक्तिमत्त्व मात्र् मला अजूनही उलगडलेले नाही. कदाचित आपल्‍या आईला (आनंदीबाईला) आपल्‍या जन्‍माच्‍या वेळी धारच्‍या (इंदौरच्‍या पुढे १०० कि.मी.) किल्‍ल्‍यात तुरूंगवासात     ठेवणा-या मराठी सत्तेविरूद्धचा राग दुस-या बाजीरावाच्‍या मनात असेल का . . . हे व्‍यक्तिमत्त्व गोंधळवून टाकणारे आहे.
     आता फक्‍त खंड ४ आणि ५ वाचायचे राहिले आहेत. बघू थोरले माधवराव कसे भासतात . . . आणि नारायणरावांची कारकीर्द कशी होते.  

No comments: